दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
वटवृक्ष मंदीर समीतीच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना भोजन प्रसाद व राहण्याची सोय
अक्कलकोट : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही भागातील नागरिकांचे बरेच हाल झालेले आहेत. अनेक गावांचा गेल्या काही दिवसात संपर्कही तुटला होता. तालुक्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अशाच काही पूर परिस्थितीजन्य भागातील नागरिकांकरिता वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास व विद्यार्थी वस्तीगृह येथे राहण्याची व भोजन प्रसादाची सोय करण्यात आली. या भोजन प्रसादाचे वितरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पराणे व सहकाऱ्यांनी पूरग्रस्तांना केली.
याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून देवस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच सामाजिक सहकार्याची जाण ठेवून पूरसदृश्य परिस्थिती मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना भोजन प्रसादातून स्वामी प्रसाद लाभावा याकरिता या पूरग्रस्तांना भोजन प्रसादाची व राहण्याची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष पराणे, मल्लिनाथ माळी, काशिनाथ सोलंकर, बांदेश सलगर, सागर मोरे, श्रीकृष्ण परब, बसवराज हडलगी, कल्लू कुंभार, बसवराज माळी, सिद्धाराम थंब, आकाश चुंगीकर इत्यादी उपस्थित होते.