कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : सध्या संपूर्ण भारतात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो वाढु नये यासाठी राज्य शासनाने विना मास्क केसेस, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बाबत बंधने घालून दिलेली आहेत. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्याला कायमस्वरूपी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचे आदेशावरून बार्शीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी वेगवेगळ्या भागात पथके नेमुन व स्वतः या कारवाईत सहभाग घेऊन बार्शी उपविभागातील बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, पांगरी व माढा पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक २२ फेब्रुवारी पासून आजपर्यंत नियम न पाळणाऱ्यांकडून तब्बल साडेसात लाखाचा दंड वसूल केला आहे. बार्शी उपविभागातील बार्शी शहर हद्दीत ३७२६००/- रुपये, बार्शी तालुका हद्दीत १०३५००/- रुपये, पांगरी हद्दीत १०७०००/- रुपये, वैराग हद्दीत १०४८००/- रुपये आणि माढा हद्दीत ५६६००/- रुपये असा १७१० केसेसच्या माध्यमातून दंड वसूल केला आहे.
बार्शी उपविभागातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील जनतेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव न होणे करिता नेहमी मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळावे जेणेकरून एकमेकापासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखून, दंडात्मक कारवाई टाळता येईल असे अवाहन उपविभागीय पोलीस आधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी केले आहे.