कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): विज वितरण कंपनीने शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. सद्या उन्हाचा कडाका वाढत असून शेतातील उभ्या पिकांना वारंवार पाणी द्यावे लागते त्यातच महावितरणने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी सर्वत्र वीज तोडणी व कपातीचा सपाटा चालू केला आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग हतलब झाला आहे. पाणी असतानाही विजेअभावी पिके जळून जात आहेत.
महावितरणचा वीज तोडणीचा सपाटा; शेतकऱ्यांमधून संताप
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे त्यामुळे रानातील पिकांसह सर्वांची तहान वाढत आहे. अशातच महावितरण ने वीज तोडणी व वीज कपात करण्याचा सपाटा महावितरणने सुरू केला आहे. ऐन उन्हाळ्यात थकबाकी वसुलीसाठी वीज तोडणी, डीपी सोडवणे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना वेठीस धरणे अयोग्य असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम तात्काळ थांबायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कर्नाटक हे राज्य भारतात असून तेथे शेतकऱ्यांना वीज मोफत मिळते तर महाराष्ट्र राज्य पण भारतात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जाते आणि शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ शासनाने आणली आहे. अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते, कारी.
आज शेतकऱ्यावर कोरोना, लॉक डाऊन, गारपीट अशीअनेक संकटे आली असताना महावितरण ने वीज कपात व वीज तोडणी शेतकरी विरोधी आहे. सरकारने विज बिलावरील व्याज न माफ करता सरसकट वीजबिल माफ करावे. उमेश सारंग, शेतकरी, कारी.
सरसकट विद्युत डीपी बंद केल्याने जे नियमित बिल भरतात त्यांचीही पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. महावितरण शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.पाण्याअभावी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? विजय गादेकर, शेतकरी, कारी.