बार्शी: अवकाळी पाऊस बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठलाग सोडण्यास तयार नसून सोमवारी दि. 12 रोजी दुपारच्या सुमारास बार्शी तालुक्याच्या पुर्व भागातील गावात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. दरम्यान जामगाव (आ) येथील हरीदास रामलिंग खांडेकर यांच्या मालकीचे दोन बैल वीज अंगावर पडल्यामुळे मयत झाले. त्यांनी शेतातील गट नं . 22/2 मध्ये सदर बैल बांधले होते.
वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. पांगरी, घारी ,पाथरी, चारे भागातील शेतकऱ्यांच्या अंब्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. गुढी पाडव्याच्या सणामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील काही गावात शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच उभ्या असलेल्या ज्वारी, काढून टाकण्यात आलेल्या कांदा, हरभरा, पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.