कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शहरातील कश्यपी प्लॉट व या परिसरातील भागात जवळपास ७० लाख रुपये किंमतीची रस्ते, गटारी, दिवाबत्तीची विविध विकास कामे केल्याबद्दल या भागातील नागरिकांच्या वतीने आ.राजेंद्र राऊत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अष्टविनायक कॉलनी, कश्यपी प्लॉट येथील श्री गणेश मूर्तीची आरती आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आली.
नगराध्यक्ष अॅड.आसिफ तांबोळी यांच्या कारकीर्दीत सर्वाधिक विकास कामे -आ.राजेंद्र राऊत
आ. राजेंद्र राऊत यांनी बोलताना सांगितले की, नगराध्यक्ष ॲड.आसिफ तांबोळी यांच्या कारकिर्दीत शहरात सर्वाधिक विकास कामे झाली. नागरिकांच्या आणखी समस्या जाणून घेण्यासाठी मी व नगराध्यक्ष गेल्या सहा महिन्यांपासून आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहोत. कश्यपी प्लॉट भागातीलही रस्ते, गटारी, दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहेत. अपूर्ण राहिलेल्या वादग्रस्त मुख्य रस्त्याचाही विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तो ही विषय आपसांत सामंजस्याने मिटवून रस्ता लवकर पूर्ण करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
कश्यपी प्लॉट येथील ओपन स्पेस संदर्भात बोलताना ते म्हणाले की, हा प्लॉट रहिवाश्यांचा मालकीचा असून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण होताच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येईल. या हस्तांतरणाची जबाबदारी माझी, असा विश्वास देत आमदार राजेंद्र राऊत यांनी रहिवाशांच्या मनातील संभ्रम कायमचा दूर केला. त्यासोबतच, विविध योजनेअंतर्गत येथील ओपन स्पेसचा विकास करताना येथे ओपन जीमसह सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही राऊत यांनी दिले.
आमची सत्ता पालिकेत आल्यानंतर गुंठेवारीच्या कायद्यात कडकपणा आणला. आम्ही घालून दिलेल्या नियमानुसार गुंठेवारी ले आउट करताना पूर्ण रस्ते, गटार, लाईट, झाडे, बोअरवेल, पाईपलाईन ओपन स्पेसला कंपाऊंड करून तो पालिकेच्या नावावर केल्याशिवाय अंतिम मंजूरी नाही. त्यामुळे ओपन स्पेसच्या बाबतीत चूकीच्या घटना घडण्याचे कारण नाही असे मत आ.राऊत यांनी यावेळी मांडले.
पुढे राऊत म्हणाले की, मधल्या काळात शहराला शहरातल्या बऱ्याच विहिरीचे पाणी एकत्र करून ६० लाख लिटरचा पाणी पुरवठा केला. यासाठी लागणारा खर्च अंदाजे ४५ कोटी रुपये आहे. परंतू आम्ही ते अवघ्या २५ लाख रूपयांमध्ये करून शहराला पाणी पुरवठा करू शकलो. येणाऱ्या काळात चांदणी तलावातून बार्शी शहराला १ कोटी लीटर पाणी पुरवठा करण्यासाठी तेथील विहीर व पाइपलाइनचे नूतनीकरण व नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होवून बार्शी शहराला नियमित एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
यावेळी प्रस्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार मयूर गलांडे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, दादासाहेब गायकवाड, प्रमोद मालपाणी, सुहास पाटील, मनिष रूगले, नितीन गुडमेवार, नंदकिशोर पल्लोड, जिवन लोखंडे, अमर गरड, लोहीया शेठ, काळे सर, मंगेश मुलगे व माता-भगिनीं उपस्थित होते.