कुतूहल न्यूज नेटवर्क
औरंगाबाद: राज्यात लवकरच १२ हजार पोलिसांची मेगा भरती होणार. डिसेंबरपर्यंत राज्यात ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी बाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.
मोठी बातमी: राज्यात मेगा पोलीस भरती, १२ हजार पदे भरणार
पुढे बोलतांना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा.
डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस दलातील भरतीत १२ हजार २०० पदांपैकी ५ हजार २०० पदे डिसेंबरपूर्वी भरणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.