जयहिंद साखर कारखान्याच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी.
ऊस बीलासाठी जयहिंद साखर कारखान्याच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन
कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : थकीत ऊस बीलासाठी वारंवार शांततेत निवेदने देऊन सुध्दा शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्यामुळेअखेर दि. १९ मार्च रोजी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सोलापूर येथील जय हिंद साखर कारखान्याच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांनासुध्दा कोरोना पासून मरायचे नाही परंतु वारंवार शांततेत निवेदने देऊन सुध्दा व कायद्याने चौदा दिवसांत एफआरपी एक रकमी देणे बंधनकारक असतानाही कारखानदार पैसे देत नसल्यामुळे नाविलाजाने कोरोनाच्या नियमांचे पालन करत शांततेत हे बोंबाबोंब आंदोलन केले आहे. परंतु, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची देणी लवकरच न दिल्यास सोलापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय व संबंधित कारखान्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन करत २५ मार्च पासून आंदोलने करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी बालाजी गडदे, विजय थिटे, समाधान थिटे, बलभिम आरेकर, लक्ष्मण वाघचवरे, गणेश झेंडगे, ब्रम्हदेव वाघचवरे, युवराज गायकवाड, रामदास झेंडगे, रामदास थिटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.