कुतूहल न्यूज नेटवर्क
नाशिक : खुंटविहीर (ता.सुरगाणा) येथे पाणी टंचाईवर उपाययोजनांविषयी आयोजित ग्रामसभेत काही सदस्यांनी विरोध करीत सभा सुरु असतांना गोंधळ निर्माण केला. ग्रामसेवक मनोहर वाघेरे यांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसभेत ग्रामसेवकास मारहाण
खुंटविहीर येथे ग्रामसभा सुरू असतांना ग्रामपंचायतीचे सदस्य कासम वळवी यांनी ग्रामसेवक वाघेरे यांच्या डोक्यावर चापटी मारल्या. ग्रामसभेचे इतिवृत्त हिसकावून घेत सभेतून पळ काढला. शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय काम करण्यास मज्जाव केला. तसेच शिवागाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने वळवीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच यमुना पवार यांनी टंचाईच्या काळात काही पाडय़ांवर ग्रामसभेची मंजुरी न घेताच पेसा निधीतून कूपनलिका खोदून पाणी पुरवठा केला आहे. या खर्चास काही सदस्यांनी विरोध दर्शविला होता. या कामाची देयके देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस सरपंचांनी पूर्व परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त घेतला होता.
याप्रकरणी सरपंच यमुना पवार यांनी तक्रार दिली आहे. ग्रामपंचायच्या काही सदस्यांनी दमदाटी करीत आपण मनमानी करीत असल्याचा आरोप केला. कुरापत काढत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रोरीत म्हटले आहे. टंचाईविषयक सभेत गोंधळ निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने ग्रामपंचायत सदस्य कासम वळवी, वसंत झिरवाळ, सुनील झिरवाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.