कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
सतत ढगाळ वातावरण, पहाटे दाट धुके यामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी व भुरी रोगांची लागण झाली आहे. यामुळे कारी परिसरातील द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला असून संगोपन खर्चात वाढ आणि नुकसान होत असल्याने यावर्षी द्राक्ष बागेवर झालेला खर्च तरी निघेल का नाही हा प्रश्न पडला आहे. रासायनिक खते व औषधांच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव; बदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागा संकटात
बदलत्या वातावरणामुळे उत्पन्नावर परिणाम होऊन हजारो रुपये खर्च करून जपलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होत आहे. कारी, सावरगाव, नारी, हिंगणी या भागात द्राक्ष बागांचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून महागडी रासायनिक औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागत आहे. बदलत्या हवामानामुळे संकटातील द्राक्ष बाग जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे.
बदलेल्या वातावरणामुळे डाऊनी, भुरी रोगांपासून बाग वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी फवारणीचा खर्च वाढत आहे. रोजच फवारणी करावी लागत आहे. राजाभाऊ गादेकर, द्राक्ष बागायतदार, कारी