कुतूहल न्यूज नेटवर्क
अवकाळी पावसाने वैराग भागात केला कहर; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
मुंगशी प्रतिनिधी (काशिनाथ क्षीरसागर) : आवंदा खरीप गेलं आता रब्बी ही गेलं आता खावं काय? हाच मोठा प्रश्न वैराग भागातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी या वर्षी खरोखर अडचणीत सापडला आहे. वैराग भागातील दहिटणे ,मुंगशी वा.,सासुरे ,तडवळे, ढोराळे, यावली, राळेरास, शेळगाव, पानगाव, लाडोळे, उपळे, इर्ले, सुर्डी, मालवंडी, पिंपरी, हिंगणी, मळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे परिसरातील प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचबरोबर द्राक्ष पिकाला ही भरपुर फटका बसला आहे.
गतवर्षी झालेल्या अति पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडून गेले होते त्यातच हा अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी मोठा हतबल झालेला दिसत आहे. हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत त्याचे नुकसान शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे शेतकरी बिकट परिस्थितीतून आपला प्रपंच गाडा चालवीत होता गेल्या वर्षीच्या पावसाने ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन तरी देखील शासनाने त्यांनी भरलेल्या खरीप पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच रब्बीचा पिक विमाही कधी मिळेल सांगता येत नाही त्यामुळे वैराग भागातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे तरी शासनाने अवकाळी पावसाची दखल घेऊन झालेल्या ज्वारी, गहू, हरभरा व द्राक्षे पिकांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करीत आहेत.