बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आ. राजेंद्र राऊत
बार्शी दि.१५ : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीच्या पावसाने बार्शी शहरासह तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या घरांचे, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करताना आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

आ. राऊत यांनी काल बार्शी शहर व आज ग्रामीण भागातील सासुरे, मुंगशी (वा),राळेरास, शेळगाव (आर), पानगाव, मानेगाव आदी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्यांना धीर दिला. लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करून ती मिळवून देण्याचे वचन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले.
सासुरे गावातील राहुल कारंडे व मुंगशी (वा) येथील भरत शिरसागर या दोन शेतकरी बांधवांना नागझरी नदीला आलेल्या पुरातून प्रशासनाच्या मदतीने त्यांना पुरातून सहीसलामत बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. यासाठी आ.राजेंद्र राऊत हे काल रात्री 3 वाजेपर्यंत मा. जिल्हाधिकारी , मा.प्रांताधिकारी, मा. तहसीलदार यांच्या सतत संपर्कात होते. त्यांच्या संपर्कात राहून रेस्क्यू टीमच्या मदतीने बोटीद्वारे या दोन शेतकरी बांधवांचे प्राण वाचविण्यात यश आले. या दोन शेतकऱ्यांच्या भेटी आ.राऊत यांनी घेतल्या.
या वेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांच्यासोबत संतोष दादा निंबाळकर, वासुदेव बापू गायकवाड, आप्पासाहेब शिरसागर, शिवाजी सुळे, बाबा गायकवाड, नाना धायगुडे, तात्यासाहेब कारंडे, बालाजी आवारे, शरद गायकवाड व शेतकरी बांधव उपस्थित होते.