पुणे प्रतिनिधी : राज्यात ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल सुरू आहे. महाराष्ट्रात पाटोदा गावाची ओळख निर्माण करून देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटलांचा वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल २५ वर्षांनी आदर्श गाव असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पोटोदा गावात सत्तांतर होताना दिसत आहे.
भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. अनुराधा पेरे-पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मतं मिळाली. पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या पेरे-पाटील यांनी पाटोदा गावाचं रूपडं बदललं, गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. त्यात गावात त्यांच्या मुलीचा मात्र पराभव झाला आहे. या पराभवामुळे भास्कर पेरे-पाटील यांना देखील गावात पराभव होण्याची कुणकुण लागली होती का? त्यामुळे त्यांनी माघार घेतली अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.