कुतूहल न्यूज नेटवर्क
वैराग : काशिनाथ क्षीरसागर
खरीप पिके सोयाबीनसह उडीद, मूग, तूर पिकांना पावसाअभावी घरघर लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बार्शी तालुक्यातील वैराग, मुंगशी (वा), पानगाव, दहिटणे, तडवळे, यावली, पांगरी, चिंचोली, उक्कडगाव, पांढरी, जहानपूर या गावातील पिके पावसाअभावी कोमेजून, वाळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्यावर्षी अगोदरच अडचणीत सापडलेला बळीराजा परत याही वर्षी अडचणीत सापडला आहे.
पावसाअभावी शेतकऱ्यांची स्वप्ने करपली! पिकांनी टाकल्या माना
गेल्या वर्षीचा खरीप पिक विमा वारंवार मागणी करून देखील पिक विमा कंपनीने बऱ्याच शेतकऱ्यांना दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जे खरीप पिकावर अवलंबून असते तेच कोलमडून गेले आहे. गेल्या वर्षी देखील अति पावसाचा फटका बळीराजाला बसल्याने त्याच्या हातात ना पिक विमा आला ना शासनाची भरीव मदत आली. त्यामुळे शेतकरी कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन जगत आहे. शेतकऱ्याने खरीप पिकांना पेरणीसाठी व मशागतीसाठी भरपूर पैसा खर्च केला आहे आणि आता निसर्गाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे पिकविमा कंपनी तसेच शासनाने लवकर याची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.