कुतूहल न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे, राजू शेट्टी यांची टीका
पंढरपूर : गेल्या वर्षी कोरोना उपाययोजनांसाठी राज्याचे संपूर्ण बजेट खर्च केले त्याचा हिशोब जनता मागत आहे. विकासकामांना कात्री लावून केलेला हा खर्च तुमच्या भ्रष्टाचारासाठी केलेला नाही, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. आज पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आले होते. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे शासनाला अशक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे राहिल्याचा घणाघात शेट्टी यांनी केला.
शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकावणाऱ्या उमेदवाराला आघाडीचा उमेदवार करताना राष्ट्रवादीने आम्हाला विचारले होते का? असा सवाल करत या विरोधात आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सचिन पाटील यांना उमेदवारी दिल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या निवडणुकीत स्वाभिमानी मतदारसंघ वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.