fbpx

बार्शी तालुक्यातील तडवळेचा शरण कांबळे युपीएससीत देशात आठवा

काशिनाथ क्षीरसागर : कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंगशी : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तडवळेच्या शरण कांबळे याने देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे या मुळे बार्शी तालुक्याचे नाव देशभर झाले आहे. आज पोट भरुन खायला मिळेल का नाही याची खात्री नाही पण आता जी एक भाकरी आहे. ती अर्धी- अर्धी खाऊन आजची भूक भागवू म्हणजे पोरांच्या शिक्षणांचं भागवता येईल. असा विचार करून मुलांना घडवणाऱ्या तडवळेतील शेतमजूर गोपीनाथ आणि सुधामती कांबळे यांच्या मुलाने म्हणजे शरण कांबळेने आपल्या चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.

अशिक्षित व हलाखीच्या परिस्थितीला शरणने जिद्दीने शरणागती पत्करण्यास भाग पाडले आहे. गोपीनाथ ज्ञानदेव कांबळे यांनी रात्र शाळेत जाऊन कसबसं दुसरी पर्यंत शिक्षण घेतलं लहान असतानाच घरातला कर्तबगार पुरुष म्हणून लवकरच जबाबदारी गोपीनाथ यांच्यावर पडली. सुदामती यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला अवघ्या दीड एकर क्षेत्रावर तेही कोरडवाहू कसबसं गुजरा सुरू झाले अशातच दादासाहेब आणि शरण अशी दोन मुले जन्माला आली. अत्यंत हलाखीची परिस्थिती. त्यात एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे घराचा कूड लांबच राहिला पत्रे घालणेही फारच कठीण होतं . आपण कसं बसं जगायचं पण मुलांना उच्चशिक्षित करायचं या ध्येयाने प्रेरीत होऊन गोपीनाथ दिवसभर दुसऱ्या शेतात मोलमजुरी करायचे आणि रात्री कडबा काढायला घ्यायचा सुगी करायची, गटारी साफ करायच्या, अंगावर कामे घ्यायची. रुपया रुपया जोडून वेळप्रसंगी हात उसने घेऊन मुलांचं शिक्षण भागावायचं . पण मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायचं नाही एवढंच त्यांचं काम सुरू होतं.

अनेकदा बाजारला गेलेली पिशवी रिकामी तशीच परत आली .चटणी भाकरी खाऊन उपाशी राहून त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं. थोरला दादासाहेब हा देखील बी टेक असून पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये दहा लाखांच पॅकेज घेऊन इंजिनीयर म्हणून कार्यरत आहे. तर लहान भाऊ शरणने तर आता यूपीएससीत यश मिळवलंय. शरणचे प्राथमिक शिक्षण तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर दहावी पर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे येथे झाले आहे. वैशिष्ट्य म्हणजे ९५ टक्के गुण मिळवून शरण हायस्कूलमध्ये ही दहावीत प्रथम होता. तसाच वैरागच्या विद्यामंदिर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत टॉपरच राहिला. त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ही झाला. बी टेक झाल्यानंतर बेंगलोरच्या भारतीय वैज्ञानिक संस्थेमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त करून स्वतःला सिद्ध केले.

त्यानंतर एका इंटरनॅशनल कंपनीकडून 20 लाख रुपयांचे पॅकेजची ऑफर असणारी नोकरी त्याला प्राप्त झाली मात्र त्याने त्याला नकार देत यूपीएससीची तयारी चालू केली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेंट्रल पोलीस फोर्स परीक्षेमध्ये सी ए पी एफ च्या सहाय्यक कमांडर पदासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत प्रथम प्रयत्नांमध्ये तो यशस्वी झाला असून देशांमध्ये आठवा क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय लोक सेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या आयएएस, आयपीएस यांचीही त्यांने परीक्षा दिली आहे तर फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या आय एफ एस याची ही परीक्षा तो देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *