कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (MLA JagjitSingh Patil) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिले पाऊल राज्य सरकारचेच आवश्यक आहे. कारण घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. तसेच संबंधित जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच आहे.
‘मराठा आरक्षणासाठी पहिले पाऊल राज्य सरकारचेच आवश्यक’, आ. जगजितसिंह पाटील यांचे वक्तव्य
पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना दिलेल्या निकालपत्राच्या ५६८ पानावर केलेली टिप्पणी ध्यानात घेता, एखाद्या जातीचा मागासांच्या यादीत समावेश होण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडून संबंधित जात मागास असल्याचा अहवाल प्राप्त करून राष्ट्रपतींकडे पाठवायचा आहे. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली की संबंधित जातीचा उल्लेख मागासांच्या यादीत होईल. या सर्व प्रक्रियेसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याखेरीज केंद्राला पुढे काहीही करता येणार नाही. पण तो अहवाल मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अजूनही प्रक्रिया सुरू केलेली नाही.
महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या न्या.दिलीप भोसले यांच्या समितीच्या अहवालात हा मुद्दा आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग का नाकारला हे ध्यानात घेऊन त्यासंबंधीचे २५ मुद्दे भोसले समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ पाठवून नव्याने अहवाल घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारल्यामुळे मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल नव्याने मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, त्यानंतर केंद्राकडील कार्यवाही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी व आपली सर्वांची आहे, ती आपण तत्परतेने पूर्ण करू असे ही आ. पाटील यांनी म्हटले आहे.