कुतूहल न्यूज नेटवर्क
एका पायावर बंगाल आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही जिंकणार- ममता बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ पैकी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, प्रचारसभांना आणखी वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली असली, तरी त्या प्रचारसभांना आवर्जुन हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. हुगली येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. (west bengal assembly election 2021-mamata banerjee criticised over bjp various issues)
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेण्याची गरजच नव्हती, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला.
नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. मात्र, हुगली येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा केला आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यामागे भाजपवाल्यांचे कारस्थान आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.
भाजपने स्थानिक चेहरा दिला नाही
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होत असून, भाजपने कोणत्याही स्थानिक चेहºयाला संधी दिलेली नाही. भाजपकडे एकही स्थानिक उमेदवार नाही. तृणमूल काँग्रेस आणि माकपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजप पाण्यासारखा पैसा वापरत आहेत, असा दावा करत मात्र, अशा पद्धतीने सोनार बांगला करता येणार नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे. दरम्यान, आठ टप्प्यातील मतदानानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.